रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा आणि सगळ्यांचे लाडके व्हा.

 #सगळ्यांचे_लाडके_व्हा .....

Katha
Marathisanskar


नमस्कार मीत्रानो 

मी सिध्देश्वर अनभुले www.marathisanskar.co.in वर आपले स्वागत करतो

मीत्रानो आज आपण खुप छान असा लेख पाहणार आहोत जो आपल्याला खुप काही शिकवून जाईल

मीत्रानो या लेखा चे लेखक मात्र 

लेखक- अनामिक.

या लेखाचे सर्व श्रेय त्यांनाच जाते



      रोज एक मिनिटे ही एक गोष्ट करा आणि सगळ्यांचे लाडके व्हा. 


सासू आणि सुनेने तर ही गोष्ट आवर्जून करावी !


      रमेश एक तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअर, आपल्या आई वडिलांबरोबर राहात होता. त्याचे मेघा नावाच्या एका मुलीवर प्रेम होते. मेघा सुद्धा एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. त्या दोघांच्या प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. 

     दोघेही जॉब करत असल्यामुळे त्यांना दिवसातले १० ते १२ तास घराबाहेर राहावे लागे. रमेशचे वडील अजून रिटायर झाले नव्हते त्यामुळे घरातली बरीचशी कामे रमेशची आई करायची. सकाळी सगळ्यांसाठी डबा बनवणे, घरातले सगळे बाहेर गेल्यानंतर घरातली छोटी मोठी कामे करणे, इत्यादी इत्यादी...

      संध्याकाळी मेघा घरी आल्यानंतर घरातला स्वयंपाक करायची. पण सॉफ्टवेअर क्षेत्रात असल्यामुळे कधी कधी तिला घरी यायला खूप उशीर होत असे. तेंव्हा रमेशची आई तक्रार न करता स्वयंपाक करून ठेवायची. 

      एक दिवस मेघाच्या कंपनीमध्ये ८ मार्च या महिला दिनानिमित्त एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये प्रत्येकाला 'आपल्या आयुष्यात कोणत्या स्त्रीने महत्वाचा वाटा उचलला' याबद्दल लिहून द्यायचे होते. म्हणजे लेख लिहून द्यायचा होता.

      मग कंपनीतल्या बरेचजणांनी आपल्या आईबद्दल लिहिले, कुणी आपल्या बायकोबद्दल लिहिले, तर कुणी आपल्या बहिणीबद्दल लिहिले. 

     तेंव्हा मेघाने विचार केला, तिच्या आईचा तिच्या आयुष्यात मोठा वाटा आहे, यात शंकाच नाही. पण सध्या सगळ्यात मोठा वाटा ज्या स्त्रीने उचलला आहे ती म्हणजे तिची सासू. कारण तिच्या सासूने घरची जबाबदारी घेतली नसती तर तिला जॉब आणि घर सांभाळायला अवघड झाले असते. तेंव्हा मेघाने आपल्या सासूबद्दल एक लेख लिहिला. त्या लेखाचा थोडासा भाग मी इथे लिहित आहे. 

     मेघाने आपल्या सासूसाठी लिहलेले शब्द ..... 

     आज अशाच एका स्त्रीबद्धल मी थोडक्यात लिहणार आहे, जिने लग्नानंतर माझ्या आईची जागा भरून काढली. ती स्त्री म्हणजे माझ्या लाडक्या सासूबाई. 

     थोडं आश्चर्य वाटलं असेल ना? पण हे सत्य आणि वास्तव आहे. जेंव्हा कंपनीचा इमेल आला की तुमच्या आयुष्यामधल्या सर्वात महत्वाच्या स्त्रीबद्दल सांगायचे आहे, पण त्यामध्ये सासू या नावाचा उल्लेख नव्हता. म्हणजे आजही मुलींना आपल्या सासूबद्दल काय लिहावे अथवा लिहूच नये, किंबहुना विचारच करू नये असे वाटत असावे. 

     पण माझ्या सासूबाईंबद्दल जेवढे लिहावे तेवढे कमीच आहे. मी त्यांना आई म्हणून बोलावते. कारण त्या खरंच माझ्याशी आईसारख्या वागतात. किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी घेतात. 

     माझे लग्न झाल्यापासून ते आजपर्यंत त्या कधीही माझ्याशी भांडल्या नाहीत किंवा तिरस्कारने पण वागल्या नाहीत, किंवा 'त्या सासू आणि मी सून' आहे या दृष्टिकोनातून कधीच त्यांनी माझ्याकडे बघितले नाही. स्वतःच्या मुलीपेक्षाही त्या मला खूप मान देतात, प्रेम देतात.

      बऱ्याचदा तर असे झाले आहे की जेवणात भाजीमध्ये मीठ कमी पडले किंवा भाजी तिखट झाली, किंवा स्वयंपाकामध्ये काही बिघडले आणि अशावेळी जर घरामध्ये सासरे किंवा नवरा बोलला तर त्या नेहमी माझीच बाजू घेऊन बोलतात. आणि नंतर मला व्यवस्थित समजावून सांगतात.

     मी जॉब करते, जवळपास १० ते १२ तास घराबाहेर असते त्यामुळे घरात वेळ द्यायला, स्वयंपाक करायला किंवा इतर घरातील कामे आवरायला मला वेळ नसतो. तरीही त्या सगळी कामे रोज चीड चीड न करता आनंदाने करीत असतात. माझा आणि घरातील सर्वजणांचा दुपारच्या जेवणाचा डबा त्याच बनवतात. एवढेच नव्हे तर मला कधी उशीर झाला तर डबा पिशवीमध्ये भरून ठेवतात. माझ्या दैनंदिन जीवनामध्ये असे एक नाही तर अनेक अनुभव मला आलेले आहेत.

      मित्रांनो, या लेखाला पहिले पारितोषिक मिळाले. ज्यावेळेस मेघाच्या सासूला समजले की मेघाने तिच्याबद्दल लेख लिहिला आहे तेंव्हा तिच्या सासूच्या डोळ्यातून घळा घळा अश्रू येऊ लागले. 

     आतापर्यंत तिच्या कामाची स्तुती कोणीच केली नव्हती. एवढे वर्षे कष्ट केले त्याचे चीज झाले होते. ती त्या लेखाचा प्रिंट-आऊट येईल त्याला दाखवत होती. जिथे जाईल तिथे ती हा प्रिंट-आऊट घेऊन जात होती. आपल्या नात्यातल्या प्रत्येकाला दाखवत होती.   

      मित्रांनो कौतुकाच्या दोन शब्दांनी मेघाच्या सासूचे आणि मेघाचे आयुष्यच बदलले.

     आज परिस्थिती खूप अवघड झाली आहे. कोणाची निंदा करायची असेल तर आपण लगेच तयार असतो पण कोणाचे कौतुक करायचे असेल तर आपण तिथे कमी पडतो. कंजूसपणा दाखवतो, तिथे आपला अहंकार आडवा येतो. आपली प्रतिष्ठा आडवी येते. 

     पण मित्रांनो तुम्ही उद्यापासून फक्त एक मिनिट अगदी मनापासून तुमच्या जवळच्या व्यक्तीची स्तुती करायला सुरुवात करा. मग तो तुमचा ड्रायव्हर असेल, तुमच्या सोसायटीचा वॉचमन असेल, तुमच्या ऑफिस मधला तुमचा सहकारी असेल किंवा तुमच्या घरातले तुमचे वडील, तुमची बायको, तुमचा भाऊ, तुमचे नातेवाईक, तुमचा मित्र, कोणीही असेल, पण तुम्ही त्याची अगदी मनापासून स्तुती करा. 

     कधी व्हाट्सएपवर कोणाच्या चांगल्या मेसेजची स्तुती करा. एखाद्याच्या चांगल्या स्टेटसची स्तुती करा. फेसबूकवर एखाद्या फोटोवर मनापासून कमेंट करा.

      मित्रांनो स्तुती, प्रोत्साहन हे सगळ्यांनाच आवडते. तुम्ही ज्याची स्तुती करता, ज्याला प्रोत्साहन देता तो तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवतो. तुम्ही हा प्रयोग जरुर करुन बघा. रोज असे एक मिनिट एका माणसासाठी केले तर महिन्याला ३० माणसे होतात, वर्षाला ३६५ माणसे होतात. विचार करा, एका वर्षात तुम्ही ३६५ लोकांचे आवडते व्हाल.

     ही लोकं आयुष्यात तुम्हाला कधीही विसरणार नाहीत. तुम्ही कधी या लोकांना भेटाल तर ते तुमचा आदरच करतील, कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी एक वेगळीच जागा असेल. या प्रयोगामुळे तुमच्या मनाला लोकांमधले चांगले गुण बघायची सवय लागेल. दोष बघायचे बंद होईल. म्हणजे फक्त दिवसातला हा एक मिनिट तुमचं आयुष्य बदलेल. प्रयोग करून पहा. 

     मला माहिती आहे हे थोडं अवघड आहे, थोडा वेळ लागेल, पण याचे फायदे तुम्हाला काही महिन्यांनी नक्कीच बघायला मिळतील. 

      मित्रांनो हा लेख जर जास्तीत जास्त सासू सूनांपर्यंत शेअर झाला तर त्यांना एकमेकींची किंमत कळेल, आणि त्यांच्यामध्ये प्रेमाचे नाते बनायला नक्कीच सुरुवात झालेली असेल.

#लेखक-#अनामिक.

(कुणी लिहिलं ते माहीत नाही पण प्राप्त प्रतिक्रिया मुळ लेखकास सादर समर्पित. नाव माहीत झाल्यास दुरुस्ती करता येईल. आवडल्यास शेअर करतांना कथेत कुठलाही बदल न करता शेअर करावी )

Cp

टिप्पणी पोस्ट करा

4 टिप्पण्या